Stereotype ची फुटपट्टी….!!
माझ्या करिअरची आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. खरतरं यावर माझाच विश्वास बसत नाहीये, पण जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला खूप छान वाटतं. या प्रवासात मी नाव कमवलं, फेम कमवलं, पैसाही कमावला, लोकांचा आशीर्वादही कमावला, पण तरीही कसलीतरी उणीव भासतेय. मला स्वत:ला मी Dissatisfied असल्याची जाणीव होतेय. याचं कारण मी किंवा इतर कुणीही असू शकेल किंवा मी जगत असलेली ही ‘System’ असेल. कदाचित या ब्लॉगच्या उत्तरार्धात मला Satisfied करणारं किंवा पटणारं उत्तर मी स्वत:च शोधू शकेन. माहीत नाही!
गेल्या १२ वर्षात मी राम गोपालपासून ते रवी जाधवपर्यंत सगळ्यांसोबत काम केलं आहे, तरीही अमृता खानविलकर आजही एका ‘अभिनेत्री’पेक्षा ‘नृत्यांगना’ म्हणून जास्त ओळखली जाते. यासाठी अनेक कारणं असतील. हीच कारणे शोधत असताना बऱ्याच गोष्टी मला खटकल्या. त्याच गोष्टी या ब्लॉगच्या माध्यमातून मांडण्याचा मी एक प्रांजळ प्रयत्न करतेय.
नृत्य ही मला मिळालेली दैवी देणगी आहे. कारण, नृत्याचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता ही कला मला अवगत आहे आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळते या कलेला मी माझ्यापरीने नेहमीच खरी उतरत असते.
मला ना खरतरं खूप गंमत वाटते आपल्या एकंदर मराठी सिनेसृष्टीची. आपला मराठी प्रेक्षक हा अत्यंत उच्च अभिरूचीचा आहे, असं म्हणतात. खूप वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर इथे काम केलं जातं, जिथे ‘कट्यार..’सारखा क्लासिकल सिनेमा बनतो तिथेच सैराटसारखा रिअलिस्टिक चित्रपटही बनतो. इथे सगळ्याच बाबतीत व्हरायटीज आहेत, हं पण इतके व्हेरिएशन्स असताना आम्हाला एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने एखादी विशिष्ट भूमिकाच केली पाहिजे असा अट्टाहास मात्र नक्की असतो. हा हट्ट कशासाठी हे आजतागयत मला कळलेलं नाही. आपल्याकडे ना कलाकारांच्या विशिष्ट भूमिकांची सवय होऊन जाते, ती सवय प्रेक्षकांना पडते की निर्मात्यांना हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. इथे दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, कॉस्च्यूम डिझायनर जर दर दुसऱ्या सिनेमातं वेगळेपण आणू शकतात. पण मग फक्त अभिनेता किंवा अभिनेत्रीलाच Stereotypeची फुटपट्टी का??
एखादी अभिनेत्री एखाद्या विशिष्ट प्रकारच्या भूमिका करते, मग ती अभिनेत्री दुसरी वेगळी भूमिका करूच शकत नाही का? सिनेमा बनवणं हे एक कला आहे असं मानलं जातं. जर इतर बाबतीत कामं निवडण्याचं, Idea Develope करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं मग या Stereotyping च्या नावाखाली आमचीच फरफट का? सिरियस भूमिका म्हणजे मुक्ता बर्वे, गावरान भूमिका म्हणजे हेमांगी कवी, बोल्ड भूमिका म्हणजे सई ताम्हणकर असे स्टॅम्प तुम्ही का लावता?? उदा. आम्ही जसे दिसतो तसे अजून किती चांगले दिसू यावर अनेक जण मेहनत घेतात, सिनेमॅटोग्राफर कॅमेरा अंगल्सवर मेहनत घेतो, व्हेरिएशन्स आणतो आणि त्याचं कौतुकही होतं. पण अमुक एक अभिनेत्री तमुक एक रोल करूच शकत नाही, हे तिला काम द्यायच्या आधीच लोकं ठरवून का मोकळी होतात?
‘नटरंग’मधल्या लावणीपासून ते ‘कट्यार..’मधल्या झरीना मिळेपर्यंतचा प्रवास हा माझ्यासाठी खूप मोठा होता, या एकंदर प्रवासदरम्यान खूप काळ निघून गेला. पण झरीनाकडे पोहचेपर्यंत लोकांनी फक्त माझ्यातल्या नृत्यकलेलाच पाहिलं. तेव्हा मला वाटलं की याआधी झरीना माझ्याकडून साकारली गेली नसती का? तर नाही. माझ्यापर्यंत अशा संधी तोपर्यंत पोहोचल्याच नाहीत. मला इतकंच कळतं की, भूमिका कुठलीही असो, प्रत्येक कलाकार ती नेहमीच जगतो किंवा त्यातून काहीतरी शिकतो आणि त्याला मी काही अपवाद नाहीये.
माझा प्रवास हा काही वेगळा आहे असं मी म्हणणार नाही. कुठेतरी आपल्या मराठी इंडस्ट्रीत सगळ्यांचा हाच प्रवास आहे. जेव्हा विचार केला तेव्हा जाणवलं की आपल्या सो कॉल्ड ‘M- Town’ आणि बॉलीवूडमध्ये एक फरक आहे. तो म्हणजे ”कास्टींग प्रोसेस”चा. आपल्याकडे Casting Directors च नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या नवीन आणि जुन्यांनाही एखादं काम मिळवण्यासाठी नेमकं कुणाकडे जावं हे कळतंच नाही. Media आहे पण Communication नाही अशी आपली सध्या परिस्थिती आहे आणि communication नसल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होतो. आपल्या डिरेक्टर्सकडे कनव्हिक्शन हवं, डिरेक्टर जर Clear राहिले की त्यांना नक्की काय हवयं, मग त्यासाठी आम्ही १० अभिनेत्रींनी किंवा १० अभिनेत्यांनी Audition किंवा Look test दिली तरी चालेल. निदान परिणाम तरी चांगले असतील आणि गोष्टी जास्त Sort होतील.
कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी तक्रारच करतेय, पण टाळी एका हाताने वाजत नाही. माझ्या Dissatisfied असण्यामागे माझीही खबप मोठी चुक असणारच. पण हा ब्लॉग लिहिताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, मराठी इंडस्ट्रीमधल्या या गोष्टींवर जर सिरीयसली विचार केला गेला तर उद्या परिस्थिती खूप सरस असेल आणि Stereotyping पासून बरीच दूर..!! फक्त गरज आहे ती C-3 ची म्हणजेच Creativity, Communication & Conviction ची.
-Written By – Amruta Khanvilkar (Actress)
[pssc_all] Shares