FAULT IN OUR STARS???
खरंतर मला ब्लॉग लिहायला सांगितल्यावर काय लिहायचं असा प्रश्न पडला, काय लिहायचं याच्यापेक्षा खरचं ब्लॉग लिहीण्याइतपत माझी पात्रता आहे का असं मला वाटलं. कारण ब्लॉग लिहीणारे लोक हे मला वाटतं की खरे ‘मार्केटीयर’ असतात. त्याचं प्रोडक्ट हे इतक्या चोखंदळपणे ते समोरच्याला देतात की नकळतपणे तो समोरचा माणूसही त्यांचा उपभोग्ता होऊन जातो आणि माझ्या ब्लॉगमूळे तर असं काही होईल यात शंकाच. त्यामुळे मी या क्षेत्रात का आले किंवा मी या क्षेत्रात येऊन काय अनुभवलं हे लिहीणं मला जास्त योग्य वाटलं. हा आता काही लोक ब्लॉग यासाठी लिहितात कि लोकांनी त्यांना प्रेज करावं, काहींनी बऱ्या वाईट प्रतिक्रिया द्यावा असा विचार करून लिहितात, मी लिहीतीये कारण मी स्वतःला खूप शहाणी समजते का तर नाही. खूप वर्षांपासून काही गोष्टी, काही प्रश्न मनात घर करून बसले होते त्याच प्रश्नांची उत्तरे, या ब्लॉगमधून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. काहीजणांना माझं म्हणणं टोचेल किंवा काहींना पटेल पण मला जे खरं वाटतंय ते मी व्यक्त होत आहे.
खुप लोकांना बोलताना, चर्चा करताना मी पाहीलयं की “मराठी इंडस्ट्रीत ‘सुपरस्टार नाही…. सुपरस्टार नाही’’. “नुसते कलाकार असून उपयोग नाहीत, आपल्याकडे ती मॅग्नेटिक पर्सनॅलिटीच नाहीये, तो स्पार्क नाहीये ज्याच्या नावे पिक्चर हिट होईल’’. आपल्यालाही हवाय सलमान,शाहरुख, आमिर, दीपिका… पण हे सुपरस्टार घडले कसे? याचं उत्तर मात्र कोणाकडेच नसतं. म्हणून म्हटलं की आपण पण शोधून बघुया या ‘सुपरस्टार’ला. कदाचित मला तरी या सुपरस्टार असण्याची व्याख्या कळेल. पण ‘Charity begins at home’ म्हणून मी आधी माझ्याच कारकिर्दीत डोकावले. मुळात सिंधुताई सारखा सिनेमा केल्यावर एक अभिनेत्री म्हणून इंडस्ट्री आणि प्रेक्षक सुद्धा मला सिरीयसली घेऊ लागले. सिरीयसली यासाठी म्हणेन कारण तोपर्यंत मीही अभिनयात amateurचं होते. अभिनयाचं बाळकडू हे मला माझ्या आईकडूनच मिळालं. त्यामुळे ती कला अवगत तर होती पण सिंधुताईमुळे त्याची जाण मला आली. तोवर सतत वाटत राहायचं कि मी नवीन आहे, कुठेतरी आपण कमी पडतोय, काहीतरी लॅकींग आहे त्यामुळे काही छान घडलं तर मज्जा येईल आणि सिंधुताई घडला. सिंधुताई झाल्यावर आता पुढे काय? आणि मग मला कामं येत गेली. नाटक, सिनेमा, मालिका अशा तिनही माध्यमात मी कामं केली. त्यानंतरही मला खुप लोकं विचारू लागले की तू तिनही माध्यमात काम का करतेस? ”खूप ओव्हर एक्सपोस होतेस तू”. तर त्यांना मी सांगेन की कलाकार हा नेहमी कौतुकाचा भुकेला असतो, त्याच्या कामाची प्रशंसा झाली की त्याची जबाबदारी आणखी वाढते त्यामुळे मीही कामं करत गेले आणि आजवर करत आहे. आणि महत्वाचं कारण म्हणजे आज मराठी इंडस्ट्रीत जवळजवळ ८०% कलाकार हे त्यांचं घर त्यांच्या ॲक्टींगवरच चालवतात. (८0 टक्क्यातीलच मी एक). एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत जसे एम्प्लॉयीस असतात तसे आम्ही या फिल्म इंडस्ट्रीचे एम्प्लॉयीस आहोत. याचं कारण म्हणजे त्यांचा त्यांच्या कलेवर या इंडस्ट्रीवर तितकाच विश्वास आहे आणि त्यांच्यात तो ॲक्टींगचा किडाच आहे जो त्यांना इतर काही करण्यापासून वंचित ठेवतो. पण आपल्या या मराठीसिनेसृष्टीत कलाकारांना त्यांच्या मेहनतीइतपत मानधन मिळतं का? तर नाही, कारण आमच्या मिटींग्सच ‘आमचा सिनेमाना जरा लो बजेट आहे’ या विधानाने सुरू होतात. मग आम्हालाही अशा १० लो बजेट सिनेमांना होकार द्यावा लागतो. त्यातल्या सहा सिनेमांचं शुट आम्ही अर्धवट करतो कारण ते ‘लो बजेट’ तिथवर संपतं आणि उरलेले चार सिनेमे आमचे रिलीज होतात. बरं एक अभिनेत्री म्हणून आम्ही करत असणारे, सामान्य माणसांच्या भाषेतील ‘नखरे’ यांचा हिशोबच वेगळा. मग हे तुटपुंज बजेट घेऊन आम्ही कसे काय तुमच्या शाहरूख आणि सलमान सारखं ईद आणि दिवाळीलाच यायचं? सगळ्या दिग्दर्शकांना वाटतं की आपल्या सिनेमात अंकुश आणि स्वप्नील असावा कारण मराठी माणूस, मराठी प्रेक्षक हा त्यांना बघायला येतो. अहो मग असं असेल तर त्यांच्यावर तितका खर्च तर करा. सिनेमाचं बजेट तर वाढवा. बरं इथवर सगळं ठीक पण एक अभिनेत्री म्हणून सतत जाणवणारी गोष्ट म्हणजे एक अभिनेता आणि अभनेत्री यांच्या मानधनात असणारी तफावत. आम्हाला खरंच तितकं एक्सपोजर मिळतं का? एखादा स्त्रीप्रधान चित्रपट करत असताना देखील अभिनेत्रीला एका आघाडीच्या अभिनेत्यापेक्षा कमीच मानधन मिळतं. मग जर आमचं पोट आमच्या अभिनयावर चालतं तर अशावेळी इतर माध्यमांचा देखील विचार करावा लागतो हं आता या नाण्याची चांगली बाजू म्हणजे या तिनही माध्यमात काम केल्यानंतर आज माझ्याकडे २ आंतराष्ट्रीय आणि २५च्या वर बाकी पुरस्कार आहेत. पण मी सुपरस्टार झाले असं मला कधी वाटलचं नाही.
नेहमी नॉन ग्लॅमरस रोल करणाऱ्या मला सतीश राजवाडे आणि संजय जाधव यांनी गैर आणि तू ही रे या चित्रपटातून वेगळ्या रूपात लोकांसमोर प्रेजेंट केलं आणि माझी प्रतिमाच पालटली. एखादा सिनेमा हिट होण्यासाठी त्या सुपरस्टारचं नुसतं नावच पुरेसं असतं पण माझ्या बाबतीत हे कधी घडलचं नाही रादर मी म्हणेन की मराठी इंडस्ट्रीत हे घडत नाही नुसत्या नावावरती पिक्चर हिट होतचं नाहीत. असं असतं तर एका सुपरहिट सिनेमानंतर सुपरस्टार झालेल्या कलाकारांचे पुढील काही सो कॉल्ड सिनेमे फ्लॉप नसते गेले पण ते घडतंय. त्या एका सुपरहिट सिनेमानं त्यांना ते स्टारडम दिलं. पण मग हेच का ते सुपरस्टार?
खरंच असा प्रश्न पडतो कि कुठलाही कलाकार हा स्वतःला सुपरस्टार बनवू शकतो का आणि तेही फक्त स्वतंत्रपणे तर नाही एक सुपरस्टार बनवायला त्या सुपरस्टारची टिम, त्याचे फिल्ममेकर्स आणि सर्वात महत्वाचे प्रेक्षक यांचा सिंहाचा वाटा असतो. कारण एखादा कलाकार हा सुपरस्टार तेव्हाच होतो जेव्हा एखाद्या फिल्ममेकरला स्वतःवर विश्वास असतो. तोच विश्वास तो त्या कलाकारावर ठेऊन सिनेमा करतो. तो त्या सिनेमाला, त्या नटाला अशाकाही प्रकारे प्रेक्षकांसमोर प्रेजेंट करतो की प्रेक्षक त्या सिनेमाला आणि त्या कलाकाराला(मग तो अगदी नवखा कलाकार का असेना) डोक्यावर घेतो आणि तो सुपरहिट ठरतो. उदाहरण द्यायचं झालं तर सैराट आणि आता परिस्थिती तुमच्या समोर आहे म्हणजे “सिर्फ नाम ही काफी हे”. हि झाली मला आजवर कळलेली सुपरस्टारची व्याख्या आणि पुढे समजून घ्यायचीये ती सुपरस्टार होऊ पाहणाऱ्या कलाकारांची व्याख्या.
मला अजून एक सांगावसं वाटतं कि मला बहुतांश लोक एक प्रश्न आवर्जून विचारतात, ज्या पिढीला ॲक्टर्स व्हायचं आहे किंवा या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी काय करायचं तर या सगळ्यांना मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड सांगेन कि माझ्या रायजिंग सुपरस्टार मित्रांनो ॲक्टिंग मध्ये करियर करणं आणि ॲक्टिंग मध्ये इंटरेस्ट असणं या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ज्या आताच्या पिढीने समजणे खूप महत्वाचं वाटतं मला. एखादी सिरीयल लीड रोल मध्ये मिळाली की लगेच सातवे आसमॉंपर जाऊ नकात. आज टॉपचे ॲक्टर्स सुद्धा चांगली कामं मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. काहीजणांकडे चांगली कामं आहेत पण अवॉर्ड्स साठी स्ट्रगल करतात, काहीजणांकडे अवॉर्ड्स असतात पण फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी स्ट्रगल करतात. कारण इथे नुसतं येऊन उपयोग नाही तर तग धरून राहणं महत्वाचं आहे. इथलं ग्लॅमर, फेम नुसतं बघू नकात तर एक सुपरस्टार घडत असताना त्याने घेतलेली मेहनत ही लक्षात घ्या. मी हे सगळं बोलू शकते, कारण माझ्या अभिनयाचा प्रवास हा रीळ वापरून शूटिंग करण्यापासून ते २३ रिटेक्स घेणाऱ्या डिजिटल कॅमेरापर्यंतच्या कलाकारांचा आहे.
मी स्वतःला खूप नशीबवान समजते एक अभिनेत्री म्हणून. कारण माझ्या जन्माची शिदोरी ही खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण आहे. इथलं एक एक पात्र वठवताना ते पात्र मी स्वतः जगलीये. आणि असं क्षेत्र मिळण्यासाठी मी म्हणेन कि आधी केलेली पुण्याई आम्हाला इथवर घेऊन येते. मी माझ्या प्रेक्षकांचे आणि आजवर काम केलेल्या माझा सर्व दिग्दर्शक तसेच माझ्या सर्व सहकलाकार मित्रांचे मी आभार मानू इच्छिते कारण माहित नाही कि मी परत कधी ब्लॉग लिहीन, पण ही संधी मी गमावणार नाही. कारण माझ्या सर्व कामांची पोचपावती या सर्वानी वेळोवेळी माझापर्यंत पोहचवली आणि तसतशी मी घडत गेले. I Know की माझ्या अपेक्षित बदलाची क्रांती व्हायला काळ जाईल पण हे तोवर घडणार नाही जोवर या सुपरस्टारच्या मेकींग मध्ये तो कलाकार, फिल्ममेकर आणि तुमचा प्रेक्षकवर्ग हे टिम असतील. त्यामुळेच मी म्हणेन कि जेव्हा तुमच्या रसिक मायबापांना तुम्ही त्यांच्यातले वाटता, जेव्हा तुमच्या प्रेक्षकांचा तुमच्यावर विश्वास असतो खरंतर तेव्हाच एक सच्चा सुपरस्टार जन्माला येतो.
-Written by – Tejaswini Pandit (Actress)
[pssc_all] Shares